पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याचे पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसला असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश करण्याअगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे माध्यमांना सांगितले.
पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याअगोदर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात आणि माझ्यात अंदाजे दोन तास चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून माझे कार्यकर्ते माझ्या चांगल्या, वाईट काळात माझ्यासोबत असतात. त्यांच्यावर मी अन्याय करणार नाही. माझ्या इंदापूरच्या जनतेने मला कायम साथ दिली आहे. त्यांच्या भावनेचा आदर करत मी जनतेच्या पाठीशी उभा राहणार आहे. आता या चर्चेतून तुमचे म्हणणे जे असेल त्यानंतर जो काही मी निर्णय घेईल, तो माझा वैयक्तिक निर्णय असणार आहे, असे मी फडणवीसांना सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील उत्तर देत म्हटले की, ‘ठीक आहे तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो तुम्ही घ्यावा’.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील पक्षप्रवेशाची तारीख काही ठरली आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले की, हा निर्णय वैयक्तिक माझा आहे. आम्ही सर्व जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुहूर्त अजून ठरला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याबाबत निर्णय घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही.’
हर्षवर्धन पाटलांच्या या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाचे आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील हे पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आम्हाला आनंदच आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते, मात्र आमचे संबंध कायम होते’, असे सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर म्हणाल्या.