

मुंबई : दिवाळी झाली तरी पाऊस महाराष्ट्रातून जाण्याचे नाव घेत नाही. आगामी पाच दिवस पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात वर्तवली आहे. मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
गेला आठवडाभर राज्यात उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले. मुंबई, सोलापूर, सातारा, पुणे आणि कोकणातील काही भागांत अचानक आलेल्या सरींनी नागरिकांना गारव्याचा दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील चार दिवस पावसाचे
२५ ऑक्टोबरला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २६ ऑक्टोबरला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. २७ ऑक्टोबरला रायगड, पुणे, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. २८ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.