
मुंबई : राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम असून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत वीज पडून, पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.
पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी - १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे - २४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण - ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा - ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून २२,३४५ क्युसेक, सीना नदी - सीना धरणातून २८९ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याचे राज्याच्या आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बोरघर, वावे, तर्फे, नातू, चिंचवली या रस्त्यांवरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी, अंगणवाडी, पन्हाळे, फणसूर रस्त्या येथील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे.
चिंचगर, कोरेगाव, भैरवी रोडवरील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर-चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
२४ तासांत रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघरमध्ये ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक ३१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.