

मुंबई : राज्यातील ‘हिंदू-वाणी’, ‘हिंदू-वैश्य’ आणि ‘हिंदू-वैश्यवाणी’ या तीनही नोंदी एकाच ‘वैश्यवाणी’ जातीच्या असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या तीनही नोंदी इतर मागास प्रवर्गातच मोडत असल्याचे नमूद करत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने बुधवारी याबाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार संबंधित व्यक्तींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
राज्य मागासवर्ग आयोगाने मार्च २००८ मध्ये सादर केलेल्या अहवालात ‘हिंदू-वाणी’, ‘हिंदू-वैश्य’ आणि ‘हिंदू-वैश्यवाणी’ या तिन्ही जाती ‘वैश्यवाणी’ असल्याचे नमूद केले होते.
पर्यायी पुरावे ग्राह्य
दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर केवळ ‘हिंदू’ अशी नोंद असली तरी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग शासनाने स्पष्ट केला आहे. अशा व्यक्तीने पुरावे सादर केल्यास त्यांना ‘वैश्यवाणी’ समजून त्यानुसार जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिले जाईल.