बेळगाव : येथील व्यापारी आस्थापनावरील फलकाच्या कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली असून कन्नड सक्ती कायद्याला तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आक्रमक पवित्र्यामुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी-कन्नड वाद पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने फलकाच्या कन्नड सक्तीला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, नहीं चलेगी नहीं चलेगी कन्नड सक्ती नहीं चलेगी, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशी जोरदार घोषणाबाजी निवेदन देताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यापारी आस्थापनावरील फलकावर साठ टक्के जागेत कन्नड लिहायला हवे असा कायदा करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
२८ जानेवारीपूर्वी व्यापारी आस्थापनावर नवीन नियमाप्रमाणे फलक लावले पाहिजेत, असा आदेश बजावला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या कन्नड सक्तीला विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. कन्नड सक्ती करणे चुकीचे असून मराठी भाषिकांवर सरकार अन्याय करत आहे. कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन मराठी भाषेतील, कन्नड भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत असून यामुळे मराठी कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.