महाराष्ट्र विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही देशात अग्रेसर राहील ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महाराष्ट्र विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही देशात अग्रेसर राहील ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील,” असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, “महाराष्ट्र मध्यकाळापासूनच अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी, याद्वारे विविधतेमध्ये एकतेचे अद्भुत उदाहरण मराठा सरदारांनी प्रस्तुत केले होते.

सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. देशात स्थापन केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमितून शोषित, वंचितांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तिमत्त्व ठरले,” असेही ते म्हणाले. दगडूशेठ हलवाई परिवारातर्फे स्थापित गणपती मंदिराद्वारे स्व. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळक यांच्यासमवेत गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव इंग्रज सरकारविरोधात राष्ट्रवाद तसेच सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उदयास आला. या माध्यमातून दगडूशेठ परिवाराने देशाच्या राष्ट्रीय, राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणाल्या की, “स्व. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई हलवाई हे परोपकारी आणि सधन दाम्पत्य होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांच्या हवेलीत होत असत. त्यांनी स्थापन केलेले गणपती मंदिर प्रसिद्ध झाले असून, मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.” दरम्यान, यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आणि राईज अॅण्ड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पी. पाटील, बोन्साय कला आणि पर्यावरण जागृती विषयात पहिली डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. प्राजक्ता काळे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in