
काल बेळगावमध्ये एका टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आणि हा महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला. याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले असून अनेक शहरांमध्ये आंदोलने केली जात आहेत. अनेकठिकाणी कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यात आले आहे. यामुळे आता दोन्ही राज्यांमधील सरकारने बससेवा बंद केली असून यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.
नाशिकमध्ये कर्नाटक सरकारच्या विरोधात स्वराज्य संघटनेचे आंदोलन केले. त्यांनी कर्नाटक बँकेच्या नावाला काळे फासत जय महाराष्ट्र असे हिले. कर्नाटक सरकारच्या विरोधात स्वराज्य संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली. तर, इकडे नवी मुंबईमध्ये कळंबोली महामार्गाजवळ कर्नाटकातून नवी मुंबईकडे येणाऱ्या बसवर काळे फासण्यात आले. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत कर्नाटकच्या बसला काळे फासले. तसेच, भगव्या अक्षरात जय महाराष्ट्रही लिहिले. तर, इचलकरंजीमध्येही ठाकरे गटाने आंदोलन केले.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारकडून बससेवा बंद
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता दोन्ही राज्यांनी आपल्या बससेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे आता कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत.