
शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काही ठोस पावले उचलली. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई अशा दोन मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. असे असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कर्नाटक सरकार सांगलीतील जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. आता या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकची महाराष्ट्रातील भूभागावर वक्रदृष्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी महाराष्ट्राच्या विरोधाची पक्षातील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया येते? याकडे साऱ्यांनाच लक्ष लागले आहे.