

मुंबई : एलपीजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केरोसिन (रॉकेल) वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून त्यानुसार प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन वितरीत केले जाणार आहे. केंद्र सरकारकडून राज्याला ३ हजार ७४४ किलोलिटर (सुमारे ३७.४४ लाख लिटर) केरोसिन मंजूर करण्यात आले असून त्याचे तात्पुरत्या स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे. विभागाच्या निर्णयानुसार केरोसिन वितरणात अंत्योदय आणि पीएचएच गटातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शुभ्र तसेच शिधापत्रिका नसलेले कुटुंब आणि स्थलांतरित मजूर यांनाही उपलब्धतेनुसार केरोसिन दिले जाणार आहे. राज्यभरात लवकरच केरोसिन वितरण सुरू होणार असून, वाटपाच्या तारखेपासून ४५ दिवसांत संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक असेल. न उचललेला साठा पुढे नेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
केरोसिन वितरणासाठी तेल कंपन्या,जिल्हाधिकारी आणि रास्त भाव दुकानदार यांच्यामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष निरीक्षण पथके नियुक्त करण्यात येणार असून, अनधिकृत विक्री आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.