

छत्रपती संभाजीनगर : महिलांसाठी सुरू असलेली ‘लाडकी बहीण’ योजना केवळ सुरूच राहणार नाही, तर सरकारचा पुढील दोन वर्षांत एक कोटी ‘लखपती दिदी’ घडवण्याचा उद्देश आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. फडणवीस अहमदपूर, उदगीर, रेणापूर आणि इतर नागरी स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. राज्यातील विविध नगरपरिषदांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. फडणवीस म्हणाले, “सरकार आता ‘लाडकी बहीण’ योजनेवरच थांबणार नाही. तर एक कोटी ‘लखपती दिदी’ घडवण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यातील अर्धे लक्ष्य या वर्षातच पूर्ण होईल. उर्वरित लक्ष्य पुढील दोन वर्षांत पूर्ण करू. २ डिसेंबरला तुम्ही आमच्या उमेदवारांची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ,” असेही त्यांनी सांगितले.
सरकारच्या शहर विकास योजनांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ग्रामीण क्षेत्रे नेहमीच विकासाच्या केंद्रस्थानी राहिली आहेत, कारण देशात सुमारे सात लाख गावे आहेत. आत्तापर्यंत शहरांकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागातून लोक चांगल्या जीवनमानासाठी आणि रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झाले. परंतु स्वच्छता, पाणी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या अडचणी शहरांना भेडसावत राहिल्या, असे फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकारही शहरांना प्राधान्य देत आहे आणि विकासासाठी निधी पुरवत आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत शहरांच्या विकासासाठी ५०,००० कोटी रुपये मिळाले आहेत आणि आम्ही शहरांचे रूप बदलत आहोत,” असे त्यांनी सांगितले.