
मुंबई : उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात सातत्याने क्रमांक एकवर राहिले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून, अवघ्या सहा महिन्यांत ९४.७१ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे विकासाच्या दिशेने महाराष्ट्राची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
परकीय गुंतवणूक देशाला चालना देणारी असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. महाराष्ट्र हा परकीय गुंतवणुकीत 'नंबर वन' राहिला आहे. आता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी समोर आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात सरासरी वार्षिक गुंतवणूक १.१९,५५६ कोटी रुपये इतकी झाली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के इतकी गुंतवणूक चालू आर्थिक वर्षात केवळ ६ महिन्यांत आली आहे. महायुतीतील माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.