

मुंबई : राज्यात बिबट्या-मानवासोबतच आता माकड-वानर आणि मानव नवीन संघर्ष सुरू झाला आहे. आता ही उपद्रवी माकडे पकडायला राज्य सरकारने बक्षिसाची घोषणा केली आहे. माकड पकडणाऱ्यांना प्रती माकड ३०० ते ६०० रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
राज्यात माकड व वानरांचा उपद्रव वाढला असून उपद्रवी माकड, वासरांना जेरबंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. माकड, पिल्लांना पकडून सुरक्षित वन क्षेत्रात सोडण्यात यावे. यासाठी प्रशिक्षितांची नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींबरोबर समन्वय साधून वन विभाग ही कारवाई करणार आहे.
राज्यात वानर/माकडांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला असून मालमत्ता व शेतपिकांचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मानव- वानर/माकड संघर्षात ही वाढ झाली आहे. मानव, माकड व वानर यांच्यातील वाढता संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.
मानवी वस्तीपासून दूर सोडणार
माकड उपद्रवाच्या तक्रारीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तत्काळ चौकशी करून उपद्रवाची तीव्रता, संख्या आणि नुकसानीचा अहवाल तयार करतील.
असे मिळणार मानधन
माकड पकडण्यासाठी सरकारने मानधनाचे दरही निश्चित केले आहेत. १० माकडांपर्यंत प्रत्येकी ६०० रुपये, तर १० पेक्षा जास्त संख्येसाठी प्रत्येकी ३०० रुपये देण्यात येणार आहेत. एका प्रकरणात देयकाची कमाल मर्यादा १०,००० रुपये असेल. १ ते ५ माकडांसाठी प्रशिक्षित व्यक्तीस १,००० रुपयांचा प्रवास खर्च दिला जाणार आहे. तसेच संख्या ५ पेक्षा जास्त असल्यास प्रवास खर्च मिळणार नाही.
अशी राबवणार मोहीम
माकडांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होण्याच्या, घरांचे व शेतपिकांचे नुकसान होण्याच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. स्थानिक सर्वेक्षण,फोटो/व्हिडीओ पुरावे आणि ‘मुक्तता प्रमाणपत्र’ अशा पारदर्शक प्रक्रियेद्वारे ही मोहीम राबवली जाणार आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे सर्व नियम पाळून, माकड-मानव संघर्ष कमी करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.