मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

गेल्या आठवड्यात राज्यातील बहुसंख्य भागांमध्ये दडी मारणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत.
मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील बहुसंख्य भागांमध्ये दडी मारणारा पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशाच्या जवळ पोहोचला आहे. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. हवेचा दाब कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात राहणार आहे.

उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे.

यलो अलर्ट

पालघर, ठाणे, पुणे घाट, लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांमध्ये २० ते २५ जुलैदरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढणार

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागात २२ व २३ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली, पूर्व कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in