

मुंबई : दिल्लीत झालेल्या कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांत अपघाताने लागलेल्या आगीच्या घटना, स्फोट, रासायनिक आणि गॅस सिलिंडर स्फोटांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र पोलिसांनी घेतला आहे. या घटनांत अनेक जणांचा मृत्यू झाल्याने, त्या अपघात म्हणून दाखवलेल्या घटनांमध्ये कुठे देशविरोधी किंवा दहशतवादी घटकांचा सहभाग तर नव्हता ना, याचीही चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व युनिट्सच्या प्रमुखांना म्हणजेच महानगरांचे पोलीस आयुक्त आणि जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांना या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत अपघात समजून सोडून दिलेल्या आगीच्या घटना, स्फोट, रासायनिक आणि सिलिंडर स्फोटाच्या घटनांचा तपास पुन्हा सुरू करून त्यांचा सर्व बाजूंनी आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
काश्मिरींची तपासणी
महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या यादीचे अद्ययावतीकरण करण्याचे कामही पोलिसांकडून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काश्मिरी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासणे आणि शैक्षणिक संस्थांशी नियमित संपर्क ठेवून अद्ययावत माहिती मिळवत राहणे, असे या निर्देशांत विशेषतः नमूद केले आहे.