

पुणे : राज्यसभेच्या एका जागेसाठी ठाकरे सेना व राष्ट्रवादी शरद पवार गट इच्छुक असताना काँग्रेसनेही यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राज्यसभेच्या बदल्यात काँग्रेसने विधान परिषदेची जागा ठाकरे सेनेला देऊ केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राज्यसभेच्या एकाच जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, अशी सध्याची स्थिती आहे. ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडावी लागेल, असा सूर ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी काढला होता. मात्र, नंतर ठाकरे सेनेने हा पवित्रा बदलत ही जागा सेनेलाच मिळायला हवी, अशी मागणी केली. त्याला काही तास उलटत नाहीत तोच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी परस्पर शरद पवार यांचा पत्ता कट केल्याचे मानले जात आहे.
विधान परिषदेची जागा आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकरिता सोडण्यास तयार आहोत. केवळ राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, असा प्रस्ताव सपकाळ यांनी ठेवला आहे. या मागणीवर अद्याप तरी दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राज्यसभेकरिता तिन्ही पक्षांनी तीव्र इच्छा दर्शवल्याने याप्रश्नी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सध्याचे राजकीय बलाबल पाहता राज्यात पाच जागांवर महायुती, तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र, सध्या तरी एका जागेवरून तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू झाल्याचे दिसत आहे. हे पाहता चर्चेतून हा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.