

मुंबई : राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या ४७ हजार ९५४ घटनांची नोंद झाली असून, हे प्रमाण देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, सन २०२५ मध्ये राज्यात ८ हजार ६४३ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून, त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत यात ७०३ नी वाढ झाली आहे, तर बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ४८२ ची भर पडली आहे. ही आकडेवारी आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ आणि महिला व बाल गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या अहवालावर आधारित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकारने विशेष गुन्हे प्रतिबंधक विभाग स्थापन करून अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पीडितांना मदतीसाठी राज्यभरात ५१ ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर महिला दक्षता समित्या गठित केल्या आहेत.
निर्भया, दामिनी, पोलीस काका, पोलीस दीदी आणि बडी कपसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी सरकार प्रयत्नशील आहे. पीडितांना १०३, १०९१, १०९८ आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकांवर चोवीस तास मदत उपलब्ध असून, मनोधैर्य योजनेद्वारे पीडित महिलांना आर्थिक व कायदेशीर सहाय्य पुरवले जात असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. पुण्यातील भोर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली असून सध्या हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुरू आहे. पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदतही देऊ केली आहे.