

मुंबई : विद्यार्थ्यांमधील अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘व्यसनमुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समित्या’ स्थापन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.
व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेसाठी गठित उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष लोढा म्हणाले, ‘ड्रग्ज-मुक्त मुंबई’ या मोहिमेचे प्रारूप आता राज्यभरात राबवले जाणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'व्यसनमुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समित्या' स्थापन केल्या जातील.’
या समित्या अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करतील, विद्यार्थ्यांमधील वर्तनातील बदल सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्यांचे समुपदेशन करतील, पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय साधतील, तसेच आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या २०२९ पर्यंत भारत अमली पदार्थमुक्त करण्याच्या ध्येयाला अनुसरून, राज्यातील अमली पदार्थांविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला असल्याचे लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालये आणि इतर भागधारकांना या वर्षभर चालणाऱ्या जनजागृती चळवळीत सहभागी करून ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ मोहिमेचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३० जुलै रोजी वरळी डोम येथे ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ मोहिमेचा अधिकृत शुभारंभ करतील, अशी माहिती लोढा यांनी दिली.
या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कॉर्प्स आणि समाजातील इतर घटक सहभागी होतील, असेही त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्तीबाबत वर्षभर जनजागृती
-शाळा आणि महाविद्यालये वर्षभरात व्यसनमुक्तीवर जनजागृती कार्यक्रम, समुपदेशन सत्रे, मार्गदर्शन उपक्रम आणि परस्परसंवादी उपक्रम आयोजित करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
-लोढा यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.