

मुंबई : राज्यातील अणुऊर्जा निर्मितीसाठी एनटीपीसीएलसह चार कंपन्यांनी मंगळवारी राज्य सरकारसोबत साडेसहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारातून २५ हजार ४०० मेगावॉट अणुऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गुंतवणुकीतून ऊर्जा निर्मितीमध्ये वेगाने प्रगती...
राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे...
कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. या कामी राज्य सरकारचा संबंधित विभाग त्यांना सहकार्य करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला आणि कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.