

मुंबई : राज्याची वाढती विजेची गरज आणि मागणी पूर्ण करणे तसेच भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता महावितरणतर्फे पुढील पाच वर्षांसाठी ४३ हजार ८७० मेगावाॅट वीज खरेदी करार करण्यात आले आहेत. ही टप्प्याटप्प्याने स्थापित होऊन २०३१-२०३२ अखेर महावितरणची वीज निर्मिती स्थापित क्षमता ७८ हजार ५९१ मे. वॅ. इतकी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातील निर्मिती संच तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने निर्माण झालेल्या वीज तुटवड्याबाबत काँग्रेसच्या हेमंत ओगले यांनी मूळ प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील काही भागांत औद्योगिकीकरणामुळे तर काही ठिकाणी वाढलेल्या उन्हाळ्यामुळे वीज मागणी वाढल्याचे सांगितले.राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत वीज मागणीत १९.५ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीव मागणीनुसार ही वीज उपलब्ध करुन देण्यात आली.
यंदा उन्हाळा वाढल्याने राज्याने खुल्या बाजारातून वीज खरेदी करताना पूर्वीप्रमाणे प्रतियुनिट ११ रुपये मोजण्याऐवजी केवळ ४ रुपये ६० पैशांच्या दराने वीज उपलब्ध करून घेतली. यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे कमी दरात वीज खरेदी शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वीज खरेदी आणि कोळसा पुरवठा प्रक्रियेत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून, ‘सॅम्पलिंग’ प्रक्रियेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीच्या करारांमधील त्रुटी दूर करून नव्याने करार आणि निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.