मुंबई : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाचे चार सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारामुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे एकूण ६,४५० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती अपेक्षित असून, सुमारे ३१,९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन येथील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण विकास महामंडळ) गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राने पंप स्टोरेज धोरणामध्ये खूप गतिशील धोरण स्वीकारले असून, प्रकल्पांची संख्या, गुंतवणूक आणि प्रस्तावित वीजनिर्मितीच्या बाबतीत संपूर्ण देशात आघाडी घेतली असून, नवीकरणीय उर्जेकडे वाटचाल करत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘नेट-झिरो’ देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. यासाठी आम्ही २०३० पर्यंत ५० टक्के पेक्षा अधिक वीज नवीकरणीय स्त्रोतांमधून मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. सौरऊर्जा आणि पंप स्टोरेजद्वारे वीजनिर्मितीवर भर देण्यात येत असून, ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी पंप स्टोरेज ही प्रणाली उपयुक्त ठरणार असून महाराष्ट्रात सौरऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू झाली आहे. त्याशिवाय इतर पर्यायी वीजनिर्मितीच्या क्षेत्रातही काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता
जैवविविधतेमुळे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमुळे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये प्रचंड क्षमता असून या क्षमतेचा उपयोग करून घेतला जात आहे. जलसंपदा विभागाने एक लाख मेगावॉट क्षमतेच्या पंप स्टोरेज प्रकल्पांचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले असून, विविध उद्योगसमूहांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या चार कंपन्यांबरोबर सामंजस्य करार
ग्रीनको एमएच-०१ आयआरईपी प्रा. लिमिटेड -
स्थापित क्षमता (मे.वॅ) - २ हजार
गुंतवणूक (रु.कोटी) – ९,६००
रोजगार निर्मिती – ६,०००
ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रा. लिमिटेड -
स्थापित क्षमता (मे.वॅ) – १,२००
गुंतवणूक (रु.कोटी) – ७,४०५
रोजगार निर्मिती – २,६००
अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड
स्थापित क्षमता (मे.वॅ) – १,५००
गुंतवणूक (रु.कोटी) – ८,२५०
रोजगार निर्मिती – ४,८००
मे. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड -
स्थापित क्षमता (मे.वॅ) – १,७५०
गुंतवणूक (रु.कोटी) – ६,७००
रोजगार निर्मिती – १,६००
असा मिळणार महसूल!
जलाशयाचा वापर केल्यास ११.३३ लाख रुपये प्रति मे.वॅ. प्रतिवर्ष भाडे
औद्योगिक दरानुसार पाणी शुल्क आकारणी
जागेचे वार्षिक भाडे प्रचलित दरांनुसार