गैरहजर आगार प्रमुखांवर कारवाई! बेजबाबदार वर्तनाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना एसटी मुख्यालयाच्या तपासणीत २५१ पैकी ३४ आगार प्रमुख कर्तव्यावर गैरहजर असल्याचे गोपनीय अहवालात उघड झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय
Published on

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. जीवितहानी झाली असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आगार प्रमुखांनी उपस्थित रहाणे बंधनकारक असताना २५१ पैकी ३४ आगारातील आगार प्रमुख कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे.

ही गंभीर बाब असून बेजबाबदार वर्तन करून कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगारप्रमुखांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन भविष्यात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद आहेत, पुलावर पाणी आले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीची वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली आहे. अनेक प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात हजर राहून आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याऐवजी काही आगार प्रमुख कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आगारप्रमुखांना संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कारणे दाखवा नोटीस तातडीने बजावली पाहिजे. त्यामध्ये त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर प्रमादीय कारवाई करण्यात येईल.

हे आगारप्रमुख ज्या विभाग नियंत्रकांच्या अखत्यारित काम करतात त्या विभाग नियंत्रकांनादेखील विचारणा केली जाणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

ठपका काय?

आगारप्रमुख हा एसटी प्रशासनाचा मुख्य घटक आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करत असतात. तो ज्या आगारात कार्यरत असतो, तेथे अनेक बसेस रात्रपाळीला मुक्कामी असतात. तसेच लाखो रुपये किमतीचे ऑइल, इंधन व इतर सुटे भाग तिथे असतात. याबरोबरच तिकीट विक्रीमधून आलेली मोठी रक्कम देखील आगारात ठेवण्यात आलेली असते. अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून आगारप्रमुखांवर मोठी जबाबदारी असते. त्याने आगारात दररोज उपस्थित राहून या सर्वांना मार्गदर्शन करणे व त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे असते. परंतु काही आगारप्रमुख हे आपल्या आगारात उपस्थित नसल्याचे सुरक्षा व दक्षता खात्याच्या गोपनीय अहवालात स्पष्ट झाले होते. कर्तव्यात कसूर करून बेजबाबदार वर्तन करणाऱ्या अशा आगारप्रमुखांवर प्रशासन लवकरच कारवाई करेल. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी दक्षता एसटी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in