टीईटी परीक्षेच्या निकालात लक्षणीय वाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला असून उमेदवारांना तो www.mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला असून उमेदवारांना तो www.mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना आपला बैठक क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे. यंदा टीईटी परीक्षेचा निकाल दहा टक्क्यांपेक्षा अधिक लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे सात टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याने यंदा परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परीक्षा परिषदेतर्फे १२ जानेवारी रोजी अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १६ जानेवारी रोजी अंतरिम निकाल उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अंतरिम निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी उमेदवारांना २१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना केवळ आपल्या लॉगिनमधूनच ऑनलाइन पद्धतीने आक्षेप नोंदवता येणार असून अन्य कोणत्याही मार्गाने आलेल्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांत टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे साडेतीन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहत होता. मात्र, यंदा परीक्षार्थींच्या संख्येत झालेल्या मोठ्या वाढीमुळे २०२५ चा निकाल दहा टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. अंतरिम निकालावरील आक्षेपांचा विचार करून अंतिम निकालाची अधिकृत टक्केवारी जाहीर केली जाणार आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) चा निकाल साधारणतः २० ते ३० टक्क्यांपर्यंत लागतो, मात्र राज्यातील टीईटीचा निकाल आतापर्यंत तुलनेने कमी होता. यंदा झालेल्या वाढीमुळे अनेक इच्छुक शिक्षकांना संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

टीईटी परीक्षेसाठी पुणे विभागातून ३७ हजार २९३, नाशिक विभागातून ३२ हजार ३१ तर नांदेड विभागातून २६ हजार १३७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यभरातून एकूण ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.

logo
marathi.freepressjournal.in