

मुंबई : भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिलाआहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात याव्यात. तसेच शाळा, सभागृह, सार्वजनिक इमारती ह्या सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुल्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रास्थळे आणि मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करावेत.