
मुंबई : बंगालच्या उपसागरात २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे. यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २५ सप्टेंबरपऱ्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे जलसंपदा विभागाला आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्थानिक प्रशासनाला राज्याच्या जलसंपदा विभागाशी समन्वय साधून सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पावले उचलण्यास सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके आणि आसपास तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि जालना येथे मुसळधार पाऊस पडत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. याशिवाय, त्यांनी जलसंपदा विभागाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सतत समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सतत समन्वय राखला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.