राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

राज्यात बहुतेक ठिकाणी उन्हाचा कडाका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा मोठे बदल झाले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे: राज्यात बहुतेक ठिकाणी उन्हाचा कडाका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा मोठे बदल झाले आहेत. हवामानतज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर काळ्या ढगांची गर्दी दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाचे संकट मात्र गडद झाले आहे.

वातावरणात पुन्हा बदल होणार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढगाळ हवामानामुळे पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणारा असून, दोन-तीन दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल आणि तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका जाणवेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

पावसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शुक्रवार २० मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. मंगळवार ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. तसेच २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

शुक्रवारी हलका पाऊस?

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्यावेळी नागरिकांनी, शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता घ्यावी. अशावेळी झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली, तसेच ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरांतील हवामानातही बदल होणशर असून, मुंबईत २० मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे वर्तविण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in