मुंबमुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारीला सकाळी हाती घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान मतदान झाले. अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
रायगडमध्ये ५७.७७ टक्के मतदान
दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रायगडमध्ये ५७.७७ टक्के, रत्नागिरीत ४७.३८, सिंधुदुर्ग ५०.१०, पुणे ५१, सातारा ५२.०२, सांगली ५१.४७, सोलापूर ४७.६६, कोल्हापूर ५८.८१, छत्रपती संभाजीनगर ५१.५२, परभणी ५५.७१, धाराशिव ५०.०७ आणि लातूरमध्ये ५०.०५ टक्के मतदान नोंदवले गेले.
मतदानाची अंतिम टक्केवारी वाढणार
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीसाठी ५२.०२ टक्के इतके मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढणार आहे.