मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी एकूण ६८.२८ टक्के मतदान झाले असून आज सोमवारी या निवडणुकांची मतमोजणी होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २ हजार ६२४ तर पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठी ४ हजार ८१४ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ६८.२८ टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदान परभणी जिल्ह्यात झाले असून सर्वात कमी मतदान रत्नागिरी जिल्ह्यात ५५.७९ टक्के इतके झाले आहे.
प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण
मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.