"घटना पायदळी तुडवणाऱ्यांना..." उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

छ. सभांजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' या सभेत उद्धव ठाकरेंनी केला भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल
"घटना पायदळी तुडवणाऱ्यांना..." उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

आज महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये 'वज्रमूठ' सभा घेतली. यावेळी सर्वांच्या नजर होत्या त्या उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. "आम्ही घटनेचे रक्षण करणार आहोत. घटना पायदळी तुडवणाऱ्यांना पायाने तुडवल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, भाजप न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहत असून न्यायवृंदामध्ये आपली माणसे घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचे ऐकलेच पाहिजे, असे यांचे म्हणणे आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल" अशी टीका यावेळी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा केंद्राने एक मालकधार्जिणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही. पण आता हे मिंधे सरकार राज्यात तो कायदा लागू करू बघत आहे," असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "तुम्हाला दुसरा पक्षच शिल्लक ठेवायचा नाही. देशात एक विधान, एक निशाण असे तुम्हाला राबवायचे आहे. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

"अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची. मी म्हटले मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेकाचे, हिंदुत्वाच्या गप्पा करू नका." अशी टीका त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. तसेच, मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही. हिंमत असेल, तर तुम्ही पंतप्रधान मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो." असे पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला दिले.

logo
marathi.freepressjournal.in