
विजय पाठक/जळगाव
एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी पालकमंत्रिपदासाठी हट्ट करणे हा त्या मंत्र्यांचा हावरटपणा आणि आचरटपण आहे. यांना राज्याच्या विकासापेक्ष एकमेकांशी स्पर्धा करून जास्तीचे पदरात पाडून घ्यायचे आहे, म्हणून हा वाद सुरू असल्याची टीका माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना येथे केली.
एकनाथ खडसे म्हणाले की, महायुतीच्या आमदारांमध्ये प्रथम मंत्रिपद मिळावे म्हणून स्पर्धा होती. मंत्रिपद मिळाल्यानंतर याच जिल्ह्याचे मंत्रिपद हवे यासाठी हट्ट धरला जात आहे हे, हावरटपणाचे लक्षण आहे. नाशिक, रायगड कोल्हापूरमध्ये ही पालकमंत्रिपदाची खदखद दिसून आली. नाशिकचा वाद तर विकोपाला गेला आहे. राज्याच्या विकासापेक्षा एकमेकांशी स्पर्धा करून जास्त पदरात पाडून घ्यायचे असल्याने हा वाद सुरू आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले. या त्यांच्या वक्तव्यावर बोलतांना काम करणारी माणसे असल्यावर त्यांना गरीब आणि श्रीमंत जिल्हा म्हणायची गरज काय, आपल्याला राज्याच्या विकासासाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एसटी भाडेवाढीबददल बोलतांना ही भाडेवाढ म्हणजे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार आहे असे सांगत राज्य शासनाने ज्या विविध सवलती नागरिकांना जाहीर केल्या. त्या सवलतींचे एसटी महामंडळाला येणे सरकारकडे आहे ते जरी सरकारने महामंडळाला दिले. तरी एसटीचा तोटा भरून निघेल आणि एसटीला भाडेवाढ करावी लागणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.