
जालना : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. या आंधळेला मंत्री धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवले असल्याचा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी केला.
जरांगे-पाटील यांनी सोमवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले. यांनी पाप केली आहेत, आता पाप झाकण्यासाठी बाबांचा वापर करत आहेत. सगळ्यांवर अन्याय झाला आहे, असे जरांगे म्हणाले.
मध्यरात्री मुंडे भेटले; कराडही हजर होता
विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांच्याकडून मला ७ ते ८ दिवस भेटीसाठी निरोप येत होता. माझ्याकडे गर्दी असल्याने दोन-तीन वेळा ते अर्ध्या वाटेतून माघारीही गेले होते. त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले. त्यावेळी मी सर्व लोकांना भेटून झोपलो होतो. मात्र एक-दोन तास झाले तरी ते काही तिथून गेले नाहीत. त्यामुळे आमच्या लोकांनी मला झोपेतून उठवले आणि सांगितले की तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, असे धनंजय मुंडेंकडून सांगण्यात आले आहे. आपण तर सन्मान करणारे लोक आहोत, जातीयवादी लोक नाहीत. त्यामुळे मग मी त्यांना भेटलो. त्यावेळी वाल्मिक कराडही त्यांच्यासोबत होता, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.