

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात मंगळवारी हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी ‘आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही,’ असा आक्रमक निर्धार व्यक्त केला. मोर्चात काँग्रेस नेते सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच छत्रपती शाहू महाराज सहभागी झाल्याने आंदोलनाला मोठे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाले.
मोर्चात ग्रामीण भागातील महिलांची मोठी उपस्थिती होती. राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार हा महामार्ग विदर्भातील वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या भागापर्यंत जाणार आहे.