
मुंबई : २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू, तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या खटल्याचा निकाल गुरुवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी ‘एनआयए’ने न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष ‘एनआयए’ न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या विस्तृत निकालाचे वाचन अद्याप पूर्ण झाले नसल्याने सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ‘एनआयए’ न्यायालयात मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या कालावधीत बॉम्बस्फोटाची सुनावणी करणारे न्यायाधीश वेळोवेळी बदलले. न्यायाधीश लाहोटी हे पाचवे न्यायाधीश आहेत. त्यांची नाशिक येथे बदली झाली असतानाच, बॉम्बस्फोट पीडितांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला. आता विशेष न्यायालयाने खटल्याच्या निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली आहे, त्यामुळे गुरुवारी निकाल अपेक्षित आहे.