
मालेगाव : २००८ मध्ये शहरातील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी एनआयए विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र, जल्लोष सुरू असतानाच फटाके फोडण्यावरून हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले.
बॉम्बस्फोट प्रकरण निकालानंतर, आम्हाला फटाके फोडू द्या, आमचा आनंदाचा दिवस आहे, अशी विनंती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केली. तथापि, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी पोलिसांनी परवानगी नाकारली.
परिणामी, पोलीस कर्मचारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. फटाके फोडले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. मात्र, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालेल. पण, फटाके फोडणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पोलिसांनी काही प्रमाणात फटकेही जप्त केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात आला.