लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील दोन तालुक्यांत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड...
लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज (दि.७) मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान होत आहे. परंतु, राज्यातील लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दोन तालुक्यांत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. तथापि, प्रशासनाने त्वरीत दखल घेत समस्या सोडवल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या एक्सवरून (आधीचे ट्वीटर) दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे मतदान केंद्रावर मतदान ४५ मिनिटे खोळंबले होते. तर, सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात माढा लोकसभा अंतर्गतच्या पाथर्डी येथे ईव्हीएम २० मिनिटांसाठी बंद होते. या दोन्ही घटनांची दखल घेत प्रशासनाने तांत्रिक बिघाड दूर केला असून सध्या मतदान सुरळीत आणि शांततेत सुरू आहे.

लातूर आणि माढ्यात महायुती-महाविकास आघाडीत चुरशीची लढत

लातूरमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.४८ टक्के आणि माढा मतदारसंघात ३९.११ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ जागांवर मतदान सुरू आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडू डॉ. शिवाजी काळगे विरूद्ध महायुतीचे सुधाकर श्रृंगारे निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर, माढा मतदारसंघात महायुतीकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील माहिते-पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in