मलिक वाद : अजितदादा गटाची कोंडी

दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी घेरले
मलिक वाद : अजितदादा गटाची कोंडी

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. नवाब मलिक मुद्द्यावर अजितदादांना गुरुवारी दिलेल्या पत्रानंतर खळबळ उडाली. शुक्रवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मलिक प्रकरणाने उपमुख्यमंत्री अजितदादा गटाची कोंडी झाली. आक्रमक विरोधकांना तोंड देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची धावाधाव झाली.

माजी मंत्री नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी हजर होताच अजितदादा पवार गटाला पाठिंबा देण्याचे संकेत देत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेत थेट अजित पवार यांना पत्र पाठवून नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, असे गुरुवारी सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेला शिंदे गटानेही पाठिंबा दिला. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही नवाब मलिकांना घेरले. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी झाली असून, मलिक यांची बाजू सावरून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असून, या आरोपामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. आजारपणामुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर प्रथमच त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात हजेरी लावली. मात्र, महायुतीत सामिल होण्यावरून ठाकरे गटाने महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून भाजपची गोची होणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच लेटरबॉम्बचा आधार घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेऊ नये, असे सांगत यातून भाजपला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच शिंदे गटानेही सावध पवित्रा घेत फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली.

या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटालाही ठोस भूमिका घेता आली नाही. पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्याबाबत थेट उत्तर न देता आधी नवाब मलिक यांची भूमिका समजून घेऊ आणि नंतर उत्तर देऊ, असे सांगितले. तसेच फडणवीस यांनी पाठविलेल्या पत्रावरून आमची चर्चा झाली. परंतु या पत्राचे काय करायचे, ते मी बघून घेईन. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असे म्हणून वेळ मारून नेली. दुसरीकडे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नवाब मलिक आमच्यासोबतच असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्यावरून अजित पवार गटात गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अजितदादा गटाची धावाधाव

नवाब मलिक यांच्याविरोधातील लेटरबॉम्बमुळे अजित पवार गटाची धावाधाव सुरू झाली असून, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी, नवाब मलिक यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे मलिक यांच्याबाबत लगेचच भूमिका घेणे योग्य नसल्याचे सांगितले. तसेच एक आमदार म्हणून त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार असल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव केली. मात्र, काहीही झाले, तरी या अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.

...मग पटेल कसे चालतात?

एकीकडे नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत बेबनाव सुरू झालेला असतानाच काँग्रेसने या वादात उडी घेत एकीकडे नवाब मलिक यांना विरोध करताना प्रफुल्ल पटेल कसे चालतात, असा प्रश्न उपस्थित केला. कारण प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भाजपने दाऊदचा मित्र इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावरूनही विरोधकांनी भाजपला घेरले. परंतु यावर भाजपने उत्तर देण्यापेक्षा मौन बाळगणे पसंत केले आहे.

...........

logo
marathi.freepressjournal.in