मनोज जरांगेंची छगन भुजबळ यांच्यावर टीका; म्हणाले, "छगन भुजबळ पनवती..."

अवकाळी आणि गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळ हे आज नुकासानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत.
मनोज जरांगेंची छगन भुजबळ यांच्यावर टीका; म्हणाले, "छगन भुजबळ पनवती..."

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं गेलं आहे. वादळी पाऊस आणि काही ठिकाणी झालेली गारपीट यामुळे नाशिक जिल्हातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. दरम्यान, भुजबळ यांच्या याच पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांकडून विरोध होताना दिसत आहे. दम्यान, मनोज आरक्षणासाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील छगन भुडबळ यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे. छगन भुजबळ हे पनवती असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे-पाटील यावर बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ पनवती आहे. उगाच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. जो माणूस कायदा पायदळी तुडवतो. महापुरुषांच्या जाती जाती काढतो. जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो, घटनेच्या पदावर बसून जातीमध्ये तेढ निर्माण करतो, त्यामुळे त्याने शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे. तसंच मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काही नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायलपा पाहिजेत. हा माणूस तिथे जाऊन पंचनामे करतो का? आणखी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची शेती तुडवतो, असं जरांगे म्हणाले.

अवकाळी आणि गारपीटीमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळ हे आज नुकासानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यातील कातरणी, सोमठा, निळखेडा गावात जाऊन पाहणी करणार आहे. सोबतच, निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव, वनसगव, थेटाळे गावात देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भुजबळ पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या नुकसान पाहणी दौऱ्याला मराठा समाजान विरोध केला आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा हट्टहास का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दमम्यान, सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. तर काही भुजबळ गेलेल्या रस्त्यावर गोमूत्र शिंपून शुद्ध करण्याचा प्रकार देखील केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in