

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. “पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली, तशी आमच्याशी गद्दारी का केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
५८ लाख नोंदी सापडल्याच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी शिंदे यांच्यासह सरकारवर निशाणा साधला. नोंदी कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास मराठा समाज त्याचा जाब विचारेल, असा इशारा त्यांनी दिला.
नोंदी कमी केल्याचा आरोप करत त्यांनी, “भाजपने अशा पद्धतीने नोंदी कमी केल्या तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील,” असे वक्तव्य केले. एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याबाबतही जरांगे यांनी दावा केला की, शिंदे यांनी सुरुवातीला दौरा रद्द केला होता. त्यानंतर काही वेळात जरांगे पाटील यांनी आंदोलनातून सूट दिल्याचा संदेश मिळाल्यानंतर दौरा झाल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही जर भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती,” असा दावा जरांगे यांनी केला.