

जालना : मराठा आरक्षणाच्या मागण्या १२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास मुंबईत भव्य आंदोलन उभारण्यासाठी मराठा समाजाने 'गनिमी कावा' वापरून शांततेत मुंबईकडे कूच करावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी केले.
अंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिला असला, तरी त्यांनी 'आयव्ही फ्लुइड्स' (सलाईन) घेण्यास नकार दिला आहे. "माझा उपोषणादरम्यान मृत्यू झाला, तरी माझा मृतदेह आंदोलनासाठी मुंबईतच घेऊन जा, असा भावनिक हाक त्यांनी समर्थकांना दिली.
आंदोलनस्थळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले, मुंबईला जाताना समाजाने गनिमी कावा वापरावा. वाहनांवर झेंडे लावू नका. आतापासूनच शांततेत मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात करा. आपण मुंबईत पोहोचलो आहोत हे प्रशासनाला समजणार नाही, अशा प्रकारे गुप्तता पाळा.
आझाद मैदान किंवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर थेट गर्दी करण्याऐवजी मुंबईतील नातेवाईक, मित्र आणि परिचितांच्या घरी आश्रय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.