"देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं की काल दंगल व्हायला पाहिजे होती. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य बेचिराख झालं असतं. पण मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे. मराठ्यांपुढं प्रेमाचं ताट ठेवा, विषारी ठेऊ नका. नाहीतर याचे परिणाम देवेंद्र फडणवीसांना भोगावे लागणार आहेत. मी राज्य बेचिराख झाल्यापासून वाचवलं आहे. सत्ता इंग्रजांसारखी चालवायची की निजामशाही पद्धतीनं चालवायची ते त्यांच्या हातात आहे. पण राज्यात मराठ्यांची लाट पुन्हा उसळणार, हे लक्षात ठेवा. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसांनी केला. केसेस अजून मागं घेतल्या नाहीत. काल काही झालं असतं तर मराठा समाज पेटून उठला असता." असा घणाघात जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज आमरण उपोषण मागे घेतलं. तर उद्यापासून साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा निर्णय अंतरवाली सराटीत घेतला. जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मराठा समाजाला मला सांगायचंय १७ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. समाजाच्या आग्रहामुळे आमरण उपोषण स्थगित करत आहे. पण उद्यापासून रोज चार माणसं साखळी उपोषण करणार आहेत. मी एक दोन दिवसात उपचार घेणार आहे. त्यानंतर मी गावागावात पोहोचून लोकांशी संवाद साधणार आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. आता संचारबंदी आहे.
सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरुच ठेवणार आहे. संचारबंदीमुळं लोकांना येता येत नाही. मी सूखरुप आहे. महाराष्ट्रात अफवा पसरवू नका. मी एकदम व्यवस्थित आहे, एक दोन दिवसात उपचार घेऊन मी गावागावात संवाद साधणार आहे. लोकांशी संवाद साधण्याचा लोकशाहीत मुलभूत अधिकार आहे. साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचाही अधिकार आहे."
जरांगे पुढे म्हणाले, "विनापरवाना रास्ता रोको करण्यासाठी तुमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, मी भीत नाही, समाजासाठी काम करतो. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, नोंदी करा. गुन्हे मागे घ्या. जनतेला वेठीस धरु नका. डाव आखण्याचा प्रयत्न करु नका. तुम्हाला संधी आहे आता. निष्पाप लोकांना बाहेर काढा. मला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. त्यांना जनतेची गरज असल्यास ते आम्हाला भेटायला येतील. सरकार आता १२-१३ दिवस आहे मग जनतेच्याच हातात आहे. राजकारण माझ्या डोक्यात नाही. असतं तर यांची सर्व उमेदवार पाडले असते.
कितीही नाटकं केली तरी ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. आम्ही तुम्हाला आहो जाओ केलं, तुम्हाला मायबाप म्हटलं, त्यात शिंदे साहेब असतील, फडणवीस असतील. पाच महिने सन्मानच केला. लोकांचं ऐकावं लागतं तरच आदर मिळतो. गृहमंत्री पदाचा गैरवापर करुन पोलिसांना आदेश देतात. रात्री डागं लागला असता तर राज्य पेटून उठलं असतं. सग्यासोयऱ्यांची अमलबजावणी करा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील," असंही जरांगे म्हणाले.