मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून ते सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. जरांगेंनी कारमध्ये बसल्यावर माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी पुन्हा फडणवीसांवर टीका केली. "सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केला. त्याला सत्ता आणायची असली तर मला मारावं लागणार आहे, असं त्याला वाटतंय. षडयंत्र रचतो, कोणलाही जमा करतो आणि माझ्यावर आरोप करतो. त्याला वाटतं मी दहा टक्के घ्यावं. त्याला वाटलं मी मराठ्यांचे खूप नेते दबाव टाकून फोडले. मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे. म्हणून तो माझ्याविरोधात षडयंत्र रचतोय. मी मेलो तर मला सागर बंगल्यावर नेऊन टाका", असा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, जरांगे कारने सागर बंगल्याकडे प्रवास करत असताना तमाम मराठा आंदोलकांनी त्यांना वेढा घातला असून तेही सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.
"काल लोकांनी शांततेत रास्ता रोको केला तरीही गुन्हा दाखल केला. तो मुद्दाम मराठ्यांना संपवायला निघालाय. मला सलाईनमधून काहीतरी देऊन याला संपवा. पोलिसांनी येऊन एन्काऊंटर करा. मी पोलिसांना सांभाळून घेतो. देवेंद्र फडणवीस आलो तुझ्या सागर बंगल्यावर, थांब तिथं. मी खनदानी मराठा आहे. मी तुला झोपेतही सोडणार नाही", असंही जरांगे यावेळी म्हणाले.
"मी सागर बंगल्यावर येतो. फडणवीसांनी मला मारून दाखवावं. मला मारण्याचा हे प्रयत्न करत आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस मला ब्राह्मणी कावा दाखवत आहेत. पण हे फडणवीस काय चीज आहेत हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश का करत आहेत. अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण देवेंद्र फडणीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला सांगत आहेत. ५ महिने झाले तरी आंदोलकांवरील गुन्हे फडणवीस मागे घेत नाहीत. मी समाजासाठी काम करत असेल, तर काय चूक केलीय. मला मारायचा असेल तर लगेच मारून टाका", असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.