जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

लोकसभा निवडणुकीत आपण कुठेही उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही. याशिवाय आपण कोणाला पाडा, असेही सांगितलेले नाही. परंतु...
जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीत आपण कुठेही उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही. याशिवाय आपण कोणाला पाडा, असेही सांगितलेले नाही. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत आपण राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर म्हणजेच २८८ ठिकाणी आपले उमेदवार उतरविणार आहोत, असे मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी घोषित केले आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांसाठी फार मोठा धक्का समजला जात आहे. तसे झाल्यास राज्यातील राजकीय गणिते बदलण्याचा धोका आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले. या आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या निमित्ताने मराठा तरुणांसह समाज एकवटला. विशेषत: याचे तीव्र पडसाद मराठवाड्यात अधिक उमटले. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जरांगे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच राजकीय समीकरणे जुळविताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भेट घेतल्याने राज्यात वेगळेच राजकीय समीकरण तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, भविष्यातील राजकीय गणिते आणि विधिज्ञांचा सल्ला आणि इतर प्रमुखांशी सल्लामसलत करून सावध पवित्रा घेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यांना पाडायचे आहे, त्यांना पाडा असा संदेश देत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा शुक्रवारी केली. लोकसभेला उमेदवार दिले नसले तरी विधानसभेला २८८ जागांवर आपण उमेदवार मैदानात उतरविणार आहोत, असे ते म्हणाले. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची धाकधूक वाढणार आहे. मनोज जरांगे यांचे जालना जिल्ह्यात मतदान असून, त्यांचा भाग परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in