

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावेत, आता सरकारला अधिक वेळ दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. हे आपले 'शेवटचे आंदोलन' असेल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल आकस असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांना छुपा पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. प्रश्न न सुटल्यास मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिला. शासनाचे शिष्टमंडळ चर्चेसाठी आले तर आम्ही निश्चित बोलू, पण त्यांनी ठोस निर्णय घेऊनच यावे, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे विनाविलंब दाखले वितरित करावेत, सातारा गॅझेट लागू करून मराठा-कुणबी समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी व आर्थिक मदत द्यावी, मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, 'सारथी' संस्थेच्या प्रलंबित शिष्यवृत्त्या तात्काळ वितरित कराव्यात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाचे व्याज वेळेत वर्ग करावे, एसईबीसी आणि ईबीसी कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात यावीत, आदी प्रमुख मागण्या जरांगे यांनी केल्या आहेत.