

छत्रपती संभाजीनगर : “अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार असून, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मुंबईत जाऊ, मात्र यावेळी थेट ‘वर्षा’ बंगल्यासमोरच ठिय्या मांडू”, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. सायंकाळपर्यंत सरकार काय निर्णय घेते ते पाहू, मात्र यावेळी एकही मागणी मागे घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
'उपोषण सुरू असताना सरकारने काढलेले पत्र आता समाज बांधवांना दाखवणार असून, त्यांनी हे बरोबर आहे, असे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेणार, अन्यथा ते सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात की या सरकारने मराठ्यांना आतापर्यंत सर्वात जास्त दिले. तुम्ही आम्हाला दिले हे कुणी नाकारत नाही, पण वाटोळेही तुम्हीच केले. तुमचे मंत्री शिरसाट आणि बावनकुळे हे नाकारत आहेत, असे जरांगे म्हणाले.
'मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खूप कमी अर्ज नाकारल्याचे सांगितले, मात्र विखेंना अनेक नाकारलेल्या घटना दिसत नाहीत. फडणवीस सांगतात तसे येऊन हे इकडे बोलतात. मराठा उपसमितीवर बुजगावणे ठेवले आहे, ते काहीच काम करत नाहीत', असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.