

जालना : मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब उघड झाली असून स्वत: जरांगे-पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. जरांगे-पाटील यांनी आपण शुक्रवारी सकाळी ११ वाजता याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगून आपण मृत्यूला घाबरत नाही, असेही म्हटले आहे.
हत्येचा कट रचण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता जरांगे म्हणाले की, हे सत्य आहे की कट शिजवला गेला. हत्या घडवून आणणे किंवा घातपात करणे या सर्व गोष्टी उघड होतीलच. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालत आहेत. हा कट, षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवले आहे, हे सत्य आहे आणि ते तपासात समोर येईलच. जरांगे यांनी यावेळी कट रचणाऱ्यांना इशाराही दिला. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला आहेस, असे खूप बघितले आहेत, हे चुकीचे पाऊल उचलायला नको होते. आम्ही मराठे आहोत हे लक्षात ठेव. मी याच्यावर उद्या बोलणारच आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
मराठा बांधवांना एकच सांगतो, मी याच्या पाठपुराव्यासाठी खंबीर आहे, तुम्ही फक्त शांत राहा.
चुकीच्या ठिकाणी हात
जालन्याचे एसपी शेवटपर्यंत जातील, याची आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच कसल्याही कारणात आदेश देतात, कारवाई करतात. यामध्ये आम्ही बघू की फडणवीस खोलापर्यंत जाण्याचे आदेश देतात का, किती गांभीर्याने दखल घेतात हेही लक्षात येईल. समाज बघतोच आहे. हे गंभीर आहे हे मात्र खरे आहे. पण हे करणाऱ्यांच्या पाठपुराव्यासाठी आम्ही खंबीर आहेत. पण जो करवून घेत आहे त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन कोटींची सुपारी
मनोज जरांगे-पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.