

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीपूर्वी मदतीचे तात्पुरते आश्वासन सरकारने दिले होते. मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. त्यामुळे थरकाप उडेल असे मोठे आंदोलन उभे करु, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सराटीत बोलावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंतरवाली सराटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा करणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर घेऊन येऊ दिले जाणार नाही, असेही मनोज जरांगेंनी सांगितले. दरम्यान, यावेळी लाडक्या बहिणींना दिलेली मदतही तात्पुरती असून निवडणुकीत लाडक्या बहिणींना फसवणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
मंत्रिमंडळाने काढलेला ‘जीआर’ रद्द करता येत नाही. आम्हाला दिले म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांची मने जिंकली, प्रमाणपत्र वाटपाची फडणवीसांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.