
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा देतानाच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी ५ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात फडणवीस विरुद्ध जरांगे संघर्ष पेटण्याचे संकेत मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून जरांगे मराठा आऱरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आहेत. त्यादरम्यान जरांगे यांनी अनेकदा फडणवीस यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार स्थापन झाले आहे, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल, पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रासून जातील, गुरुवारी ५ तारखेला त्यांचे सरकार स्थापन झाले आहे.
अन्यथा पुन्हा आंदोलन
आगामी काळात गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावावे, आता ५ जानेवारीपर्यंत एक महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अन्यथा मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनासठी उभे राहून सरकारला हैराण करतील, सोडणार नाहीत. ८३ क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, २००४ च्या अध्यादेशात दुरूस्ती करावी, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, लाखो युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा आपल्या आठ ते नऊ मागण्या याच सरकारकडे केलेल्या आहेत त्या त्यांनी मार्गी लावाव्या, अन्यथा त्यांना पुन्हा मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.