मला मंत्रिपद न मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले! दीपक केसरकर यांची खंत

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडणारे शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
दीपक केसरकर, संग्रहित छायाचित्र
दीपक केसरकर, संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

सिंधुदुर्ग : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडणारे शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. मात्र, अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला, त्यांची मला कीव वाटते. मला जी संधी द्यायची ती साईबाबा देतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

“माझे मंत्रिपद देव ठरवत असतो. पण, आता मंत्रिपद नसल्यामुळे मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आनंदात आहे. मंत्रिपदाच्या काळात मी अनेक चांगली कामे केली. कुठल्याही मंत्र्याने कामे केली नसतील, एवढी कामे मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात केली. साईबाबांच्या कृपेने मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाणार, हा विश्वास आहे,” असेही केसरकर यांनी सांगितले.

“मला केंद्र व राज्यातील नेत्यांचा पाठिंबा आहे, त्यामुळे काळजी नाही. मराठी भाषा विभाग, मुंबई शहर असेल किंवा शिक्षण विभाग असेल, या विभागात मी मोठी कामे केली. मी माझ्या कामांची एक पुस्तिकाही काढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ राहील, अशीच कामे मी आतापर्यंत केली असून भविष्यातही करत राहीन,” असे केसरकर म्हणाले.

नाणारची ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासावे लागेल

“नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी ही ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का, हे तपासून पाहावे लागेल. उदय सामंत हे एवढे हुशार आहेत की, त्यांच्याबद्दल कोणी काही बोलूच शकत नाही. त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे,” असा टोला दीपक केसरकर यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in