
वडीगोद्री : आता आपल्याला रणभूमीत उतरून लढायचेय, मैदान गाजवायचेय अन् विजय खेचून आणायचा आहे, २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडायची अन् २९ ऑगस्टला मुंबई गाठायची. आता मागे हटायचे नाही. विजय मिळवायचा, त्याशिवाय मुंबईतून माघारी फिरायचे नाही. आता ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत दिला.
या बैठकीदरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’, ‘लढेंगे जितेंगे, हम सब जरांगे', 'कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला' अशा घोषणाही देण्यात आल्या. आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवले जायचे. एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही जमला, तुमच्यासमोर नतमस्तक होतो. जातीसाठी किती ताकदीने लढावे, हे सर्व देशाला तुम्ही दाखवून दिले. मराठा समाजाची दोन वर्षापासून संघर्षाची लढाई चालू असून, आता मराठ्यांनी जिंकायचे म्हणजे जिंकायचे, असा निर्धारही जरांगे पाटलांनी यावेळी केला.
राजकीय लोक त्यांच्या पक्षासाठी, निवडणुकीसाठी रात्र-दिवस खस्ता खातात, मात्र तुमच्यासाठी, तुमच्या लेकरासाठी व तुमच्या जातीसाठी कोणीच खस्ता खात नाहीत. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी आपल्या लेकराच्या अंगावर गुलाल टाकण्यासाठी सज्ज राहा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.