राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण मोर्चे आणि प्रचार सुरु आहे. आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे परत एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहे. आंतरवाली सराटी येथून रवाना झालेले जरांगे आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. दरम्यान, बीडच्या पाली गावात देखील जरांगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. तर, यावेळी बोलतांना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. "आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून घेणार असं जरांगे म्हटलं आहेत.
दरम्यान, यावेळी सभेत बोलतांना जरांगे म्हणाले आहेत की, " जे लोकं आरक्षणाला विरोध करत आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्यांनी काहीही म्हटले तरी आम्हाला काहीच देणघेण नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पयर्त मराठा समाज एकत्र राहणार आणि आरक्षण मिळवणार. तर, सरकारने लवकरात लवकर जागं व्हावं आणि मराठा समाजाला त्याच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे. राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. कारण आम्ही सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार आहोत", असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
मी या समाजाचा लेकरू असून, त्यांच्यासाठी मी लढत आहे. आता कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या आहेत. मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज सगळे कामं सोडून फक्त आता आरक्षणासाठी वेळ देत आहे. तर, आम्ही देखील सरकारच्या छातीवर बसून आरक्षण घेणार आहोतच. यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येणार आहे. लोक ठिकठिकाणी थांबवून जे काहीमाझे स्वागत करत आहेत, ती वेदना आहे मराठा समाजाची. जेसीबी लावून अंगावर फुलं टाकायला मी सांगितले नाही, पण हे माझ्या समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आमच्या सगळ्या लेकरांना न्याय मिळणार आहे. असं जरांगे यांनी म्हटलं आहे .