

जालना : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून, ११ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १२ सप्टेंबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
गुरुवारी राज्य सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि मकरंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.